स्त्रिया व शूद्रांबद्दल मनुस्मृतीतील काय लिहिले आहे?

मनुस्मृती या ग्रंथामध्ये असे काय लिहिलेले आहेत की ज्यामुळे ती शूद्र (दलित) आणि महिला या दोहोंसाठी ती घृणास्पद ठरली आहे? मनुस्मृतीमधील अपमानजनक श्लोक किंवा वचने कोणती आहेत, याची माहिती या लेखात दिलेली आहे. हे विचार वाचल्यानंतर तुम्ही स्वतःच विचार करू शकाल की मनुस्मृतीतील हे विचार महिलांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी सन्मानजनक आहेत की नाहीत?

Catastrophic thoughts about women and Shudras in Manusmriti
मनुस्मृती मधील शूद्र आणि स्त्रिया यांबद्दल विचार 

मनुस्मृतीतील स्त्रिया व शूद्रांबद्दल अपमानास्पद विचार

मनुस्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. मनूने लिहिलेले धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती होय. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक संख्या 2684 आहे, मात्र काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या 2694 आहे.

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? 25 डिसेंबर 1927 रोजी तत्कालिन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले होते. समतेच्या थोर पुरस्कर्त्याने विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ग्रंथाची जाहीरपणे केलेली ही होळी होती. त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून राबवतात.

 

“मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळाले. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असे म्हणता जरी येत नसले तरी त्याची बीजे मनूने पेरली आहेत,” असे डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या ‘फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम’ या ग्रंथात लिहिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी देखील मनुस्मृती या ग्रंथाला विष म्हटले आहे (पहा बीबीसी बातमी).

1938 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील केलेले विधान खालीलप्रमाणे आहे :

“मनुस्मृती दहन हे एक दक्षतेने उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!” —डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

मनुस्मृतीमध्ये काय लिहिले आहे?

सनातनी हिंदूंसाठी पूजनीय असलेला मनुस्मृती ग्रंथ हा अस्पृश्य वर्गीयांसाठी मात्र तिरस्कारणी आहे. मनुस्मृति अत्यंत वादग्रस्त आहे. मनुस्मृतिमध्ये शूद्रांबद्दल तसेच महिलांबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि अपमानजनक श्लोक/ वचने असल्याचे सांगितले जाते. आणि याच वचनांचा आधार घेत हिंदू समाजात विषमतेची बीजे रोवली गेली व यामुळे सामाजिक विषमता वाढत गेली.

शूद्र (अस्पृश्य किंवा दलित वर्ग) मनुस्मृतीवर टीका का करतो? महिला मनुस्मृतीवर टीका का करतात? मनुस्मृती ही दलितविरोधी आणि महिलाविरोधी असल्याची टीका का केली जाते? मनुस्मृतीमध्ये असे काय लिहिले आहे की ज्यामुळे ती दलित आणि महिला या दोहोंसाठी ती घृणास्पद ठरली आहे? तेव्हा या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला मनुस्मृती मधील ते आपत्तीजनक श्लोक वा विचार जाणून घ्यावे लागतील, त्यांमधून महिला आणि शूद्र वर्गांकडे तुच्छतेने पाहिले गेले आहे. thoughts about women and Shudras in Manusmriti

आता आपण अस्पृश्यांबद्दल आणि महिलांबद्दल काय लिहिले आहे, हे जाणून घेऊया…

 

  • हेही पाहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 50 शैक्षणिक विचार

 

मनुस्मृतीमधील महिलांविषयीचे विचार

मनुस्मृतिमधील स्त्रियांविषयीचे अपमानजनक विचार खालीलप्रमाणे आहेत : Catastrophic thoughts about women in Manusmriti
  • “व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा. श्लोक 19]
  • “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 152]
  • “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 154]
  • “स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा / श्लोक 9]
  • “पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा / श्लोक 15]
  • “नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा / श्लोक 46]
  • “सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [मनुस्मृती, अध्याय 2 वा / श्लोक 13]
  • “माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [मनुस्मृती, अध्याय 2 वा / श्लोक 15]
  • “ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [मनुस्मृती, अध्याय 3 रा / श्लोक 8]
  • “जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [मनुस्मृती, अध्याय 3 रा / श्लोक 11]
  • “ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात.” [मनुस्मृती, अध्याय 3 रा / श्लोक 56]
  • “नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [मनुस्मृती, अध्याय 4 था / श्लोक 43]
  • “आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका – बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 47]
  • “स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 48]
  • “पिता, पती, पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 49]
  • “पती जरी रागावलेला असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 150]
  • “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 152]
  • “पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 155]
  • “स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 162]
  • “पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 168]
  • “स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [मनुस्मृती, अध्याय 5 वा / श्लोक 166]
  • “पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश मध्ये करून घ्यावे.” [मनुस्मृती, अध्याय 6 वा / श्लोक 2]
  • “विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे.” सारांश – कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही. [मनुस्मृती, अध्याय 6 वा / श्लोक 3]
  • “स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा / श्लोक 13]
  • “स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [मनुस्मृती, अध्याय 9 वा / श्लोक 18]

 

मनुस्मृतिमधील शूद्रांविषयी विचार

मनुस्मृतिमधील शूद्रांविषयीचे अपमानजनक विचार खालीलप्रमाणे आहेत : Catastrophic thoughts about Shudras in Manusmriti

  • शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरूण इत्यादी द्यावे. (मनुस्मृती, अध्याय 10 वा / श्लोक 125)
  • धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्रानेही माता-पिता इत्यादी पोष्यवर्गाचे संवर्धन व पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्याहून अधिक द्रव्याचा धनसंचय करू नये. कारण धनसंचय झाला असता शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो. (मनुस्मृती, अध्याय 10 वा / श्लोक 129)
  • शूद्राने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे लिंगविच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंडक घालतो. हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राणदंड द्यावा, असा उपदेश तो करतो.
  • ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने केलेल्या संभोगाबाबत- मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा – (मनुस्मृती, अध्याय 8 वा / श्लोक 366) त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो. याउलट, ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार (नाणी) दंड होई व त्याने तिच्याशी व्यभिचार केल्यास पाचशे (मनुस्मृती, अध्याय 8 वा / श्लोक 378) आणि ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे दंड होई (मनुस्मृती, अध्याय 3 रा / श्लोक 385)
  • एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाई व त्याची जीभ छाटून टाकली जाई (मनुस्मृती, अध्याय 8 वा / श्लोक 270), पण एखाद्या क्षत्रियाने वा वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे 100 व 150 दंड होई (मनुस्मृती, अध्याय 8 वा / श्लोक 267) आणि एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त 12 दंड होई (मनुस्मृती, अध्याय 8 वा / श्लोक 268) किंवा काहीच होत नसे.
  • ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.
  • पहिल्या ऋतुप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे, जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेर्पयत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय 9 मध्ये नमूद केलेले आहे.

वरील अत्यंत वादग्रस्त आणि अपमानजनक श्लोक पाहता मनुस्मृति समाजामध्ये कदापि वंदनीय ठरू शकत नाही. हे मनुस्मृतीची वाहवा करणाऱ्या सनातनी लोकांनी लक्षात घ्यायला हवे. मनुस्मृतीमधील सर्वच भाग टाकाऊ आहे, असे नाही. मात्र त्यातील शूद्र (दलित) आणि महिलांविषयीची वचने घातक आहेत. – Catastrophic thoughts about women and Shudras in Manusmriti


मनुस्मृती संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे 

प्रश्न : मनुस्मृती हा ग्रंथ कोणी लिहिला?

मनुस्मृती हा ग्रंथ मनुने लिहिला.

 

प्रश्न : मनु कोण होता?

मनु हा मनुस्मृती ग्रंथांचा रचनाकार होता.

 

प्रश्न : मनुस्मृतीचे दहन कधी झाले?

25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते.

 

प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीच्या विरोधात का आहेत?

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की मनुस्मृतीने जातीव्यवस्थेचा गौरव केला आणि भेदभावाचा प्रचार केला . त्यामुळे त्यांनी हे पुस्तक जाळून टाकले.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *